Indian Railways News => Topic started by railenquiry on Jul 09, 2013 - 03:02:06 AM


Title - एस्कलेटरचा प्रयोग यशस्वी
Posted by : railenquiry on Jul 09, 2013 - 03:02:06 AM

ठाण्यासारख्या प्रचंड गर्दीच्या स्टेशनात एस्कलेटर फार दिवस चालू शकणार नाहीत , हा समज खोटा ठरू लागला असून , तासाभरात अकराशे प्रवासी एस्कलेटरचा वापर करत असल्याचे मध्य रेल्वेच्या पाहणीत दिसून आले आहे. ठाण्यात प्रवाशांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आता डोंबिवली व कल्याणातही एस्कलेटर बसवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

एमआरव्हीसीने केलेल्या सर्वेक्षणात ठाणे हे मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन म्हणून जाहीर झाले होते. त्यामुळे या स्टेशनात एस्कलेटर बसवण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न धाडसी समजला जात होता. लाखो प्रवाशांची ये जा असल्याने एस्कलेटर फार काळ टिकाव धरणार नाही अशी चर्चा होती.

२७ जून रोजी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ वरील एस्कलेटरचे उद्घाटन झाले. त्या दिवशी उद्घाटनानंतर लगेचच एस्कलेटर बंद पडले होते. त्यामुळे एस्कलेटर चालतील की नाही याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. मात्र हे एस्कलेटर सुरळीत सुरू आहेत. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ते बंद ठेवल्याने त्याची देखभाल करणे शक्य होते.

गुरुवारी मध्य रेल्वेने या एस्कलेटरचा नेमका किती वापर होतो , हे पाहण्यासाठी खास कर्मचारी नेमून सर्वेक्षण केले. एस्कलेटर ज्या ठिकाणी रुंद फूट ओव्हर ब्रीजला जोडले जाते , तिथे सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हे सर्वेक्षण करण्यात आले. दररोज ‌एका तासाला अंदाजे अकराशे प्रवासी एस्कलेटरचा वापर करत असल्याचे सर्वेक्षणात उघड झाल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी दिली.

एस्कलेटर बसवताना तासाभरात अंदाजे एक हजार प्रवासी त्यांचा वापर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यापेक्षा जास्त प्रवाशांकडून एस्कलेटर वापरले जात असल्याचा दावा त्यांनी केला. ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ वर आणखी एक एस्कलेटर बसवले जात आहे. त्याचे काम पावसाळ्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर डोंबिवली व कल्याणातही एस्कलेटर बसवली जातील असे राणे यांनी स्पष्ट केले. एका एस्कलेटरसाठी अंदाजे ७५ लाख रुपये इतका खर्च होतो. एस्कलेटरसह गर्दीच्या काही स्टेशनांमध्ये लिफ्टदेखील बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले