Indian Railways News => Topic started by railgenie on Aug 02, 2013 - 18:01:52 PM


Title - जोरदार पावसामुळे डाऊन लाइनवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशिर
Posted by : railgenie on Aug 02, 2013 - 18:01:52 PM

भुसावळ - नागपूरकडे जाताना वर्धाजवळील शिंदी-तुळजापूर रेल्वेस्थानक परिसरात रुळांखालील भराव वाहून गेला होता. दुरूस्तीनंतर तीन दिवस बंद असलेला मार्ग सोमवारपासून एकेरी वाहतुकीसाठी खुला झाला. मात्र, मुंबईकडे सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे डाऊन लाइनवरील लांब पल्ल्याच्या गाड्या मंगळवारी दोन ते 11 तास उशिराने धावल्या.

नागपूरकडे जाणार्‍या मार्गावरील आपत्तीमुळे वाहतूक तीन दिवस बंद होती. मध्य रेल्वे प्रशासनाने 15 गाड्या इटारसी, खंडवामार्गे नागपूरकडे वळवल्या तर तीन प्रवासी गाड्या मलकापूर, अकोला, बडनेरामार्गे नरखेडहून पुढे नागपूरकडे गेल्या. तत्पूर्वी, रेल्वे प्रशासनाने भराव वाहून गेलेल्या रेल्वे रुळाची युद्धपातळीवर दुरूस्ती केली. 58 तासांच्या प्रयत्नांनंतर सोमवारी सकाळी 8 वाजता डाऊन मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू झाली. यामुळे खंडवा, इटारसीमार्गे धावणार्‍या गाड्या आता पूर्वीप्रमाणे वर्धामार्गे नागपूरकडे जात आहेत. याच मार्गाने परतीचा प्रवासही सुरळीत झाला आहे तर दुरूस्तीनंतर अप मार्गावरील रहदारी सुरळीत होईल, असे नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुमंत देऊळकर यांनी सांगितले. मात्र, आता पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. बुधवारी वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.