Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 03, 2013 - 21:00:36 PM


Title - पावसाने हाहाकार..! कोकण रेल्वे विस्कळित
Posted by : nikhilndls on Jul 03, 2013 - 21:00:36 PM

सिंधुदुर्ग- कोकणात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरूच होता. पावसामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद आहेत. बऱ्याच ठिकाणी पाणीही घुसले. पुराच्या पाण्यात नेरूर येथील गुरुनाथ शंकर ठाकूर (वय 58) व वेंगुर्ले येथील चंदू कदम (वय 45) हे बेपत्ता झाले आहेत.

संपूर्ण कोकणाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 160 मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्‍यात 257 मिलिमीटर झाला. मुंबई-गोवा महामार्गालगतच्या खारेपाटण बाजारपेठेत तब्बल बारा तासांपेक्षा अधिक काळ पाणी साचल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना दुपारी प्रशासनाने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

मुंबई-गोवा महामार्गावर काल सायंकाळी पीठढवळ नदी पुलावरून पाणी गेल्याने हा मार्ग चार तास वाहतुकीसाठी बंद होता. मध्यरात्री वाहतूक सुरळीत झाली. भुईबावडा घाटात तिरवडे खिंड येथे डोंगर रस्त्यावर आल्याने या मार्गावर वाहतूक बंद होती. खारेपाटण, गगनबावडा रस्ताही काहीकाळ बंद होता. कुडाळ तालुक्‍यात भंगसाळ नदी आणि कर्ली नदी दुथडी भरून वाहू लागल्याने या परिसरातील शेती पाण्याखाली होती. कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.