Indian Railways News => Topic started by railgenie on May 17, 2013 - 15:00:04 PM


Title - रेल्वेच्या नियोजनशून्यतेचा फटका प्रवाशांना
Posted by : railgenie on May 17, 2013 - 15:00:04 PM

एकीकडे ठाणे स्टेशनला वर्ल्ड क्लास बनविण्याची स्वप्न पाहणाऱ्या रेल्वेकडे या स्टेशनातील प्लॅटफॉर्मवर शेड टाकण्यासाठीही निधी नाही. नव्याने झालेल्या रुंद पुलाच्या बांधकामासाठी तोडलेला शेडचा भाग पुन्हा बसवणे निधीअभावी रेल्वेला वर्षभर जमलेले नाही. या खर्चाचा विचारच पूल बांधताना करण्यात आला नव्हता , त्यामुळे हे काम रखडल्याचे समजते.

ठाण्यातील दोनही पूल अरुंद असल्याने गर्दीच्या वेळी तेथे चेंगराचेंगरी होत असे. गेल्या वर्षी खासदार संजीव नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर येथे १२ मीटर रुंदीचा सर्व प्लॅटफॉर्मना जोडणारा पूल उभारण्यात आला.

या पुलासाठी पैसे नसल्याचे कारण रेल्वेने दिल्याने एमएमआरडीएने त्यासाठी निधी देऊ केला. या पुलाच्या कामासाठी प्लॅटफॉर्मवरील शेड तोडावी लागली होती. पुलाचे काम १५ ऑगस्ट रोजी पूर्ण होऊन तो खुला झाला. मात्र तोडलेली शेड पूर्ववत करणे रेल्वेला अद्याप जमलेले नाही. त्याबद्दल प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी नंदकुमार देशमुख यांनी संताप व्यक्त केला. ठाणे स्टेशनच्या पाहणीसाठी आलेले नवे जीएम बी. पी. खरे यांच्या निदर्शनासही त्यांनी ही बाब आणून दिली. प्लॅटफॉर्म क्रमांक २ पासून १० पर्यंत सगळीकडेच पुलाजवळील भागाला शेड नाही.

रेल्वे व एमएमआरडीच्या नियोजनकर्त्यांनी पुलाच्या खर्चात शेड पूर्ववत करण्याच्या खर्चाचा विचार केलाच नव्हता. त्यामुळे शेडसाठी कुठून खर्च करावा , असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला पडला आहे. रेल्वे आणि एमएमआरडीए यांच्या नियोजनशून्यतेचा फटका ठाणेकरांना बसत आहे. आता शेडसाठी प्रवाशांनी वर्गणी काढावी का , असा संतप्त सवाल देशमुख यांनी केला आहे. कडक उन्हाळा आणि पावसाळ्यात शेड नसल्यास प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे रेल्वेने तातडीने शेडचे काम हाती घ्यावे , अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.