Indian Railways News => Topic started by Mafia on Jun 30, 2012 - 16:00:09 PM


Title - वेलंकनीसाठी आणखी एक गाडी मिळणार--लोकमान्य टिळक टर्मिनल , दादर आणि सीएसटी या स्थानकातून या तीन गाड्या
Posted by : Mafia on Jun 30, 2012 - 16:00:09 PM

वेलंकनी देवीच्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी यावर्षी रेल्वेची आणखी एक अतिरिक्त गाडी यावेळी मिळणार आहे. आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा व खासदार डॉ.संजीव नाईक यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली.

तामिळनाडू राज्यात असलेल्या वेलंकनी देवीच्या दर्शनासाठी ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. या भक्तांना थेट प्रवास सोयीचा व्हावा यासाठी विशेष ट्रेनची मागणी होती. मागील वर्षी या तीर्थस्थळाकडे जाण्यासाठी ट्रेन सोडावी म्हणून रेल्वे प्रशासनाकडे आमदार-खासदारांनी पाठपुरावा केला होता. यावर्षी भाविकांची संख्या पाहता रेल्वे प्रशासनाने आणखी एक गाडी वाढवली असून ही गाडी २४ डब्यांची असणार आहे. या दोन वाढीव गाड्यांसह आता एकूण तीन गाड्या भाविकांना उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे वेलंकनी मातेच्या भक्तांना त्यांचा फायदा होणार आहे.

बुधवारी रेल्वेचे जी.एम.सुबोध जैन , डीआरएम राहुल जैन आणि सीपीटीएम आर.डी.शर्मा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीला खा. संजीव नाईक , खा.आनंद परांजपे व मीरा-भाईंदरचे आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा उपस्थित होते. बैठकीत वेलंकनी देवीच्या तीर्थस्थळासाठी दोन जादा गाड्या सोडण्याची मागणी करण्यात आली. त्यापैकी एक गाडी सोडण्याचे डीआरएम जैन यांनी तात्काळ मान्य केले.

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील ठाणे , नवीमुंबई , भाईंदर , वसई याभागातून वेलंकनी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक श्रद्धेने दरवर्षी जातात. दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रतिवर्षी लक्षणीय वाढ होत आहे. याआधी या तार्थस्थळापर्यंत थेट जाण्यासाठी रेल्वेची गाडी नव्हती. नागपट्टीनम याजवळच्या रेल्वे स्टेशनातून बस पकडून तीर्थस्थळापर्यंत पोहोचण्याची कसरत भक्तांना करावी लागत होती. पूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून या तीर्थस्थळासाठी एकच गाडी सुटत होती.

मागील वर्षी एक आणि यावर्षी एक अशा दोन अतिरिक्त गाड्या वाढवून दिल्या आहेत. तिसरी गाडी ही २४ डब्यांची असणार असून त्यामुळे या गाडीमधून मोठ्या संख्येने भाविक जाऊ शकतील. लोकमान्य टिळक टर्मिनल , दादर आणि सीएसटी या स्थानकातून या तीन गाड्या त्यांच्या वेळापत्रकानुसार २५ , २६ आणि २७ ऑगस्ट रोजी सुटणार आहेत , अशी माहितीही पत्रकात देण्यात आली आहे. यावेळी ठाणे शहरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात ठाण्यात नव्या पादचारी पुलांबद्दल कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.