Indian Railways News => Topic started by eabhi200k on Jun 10, 2013 - 09:01:21 AM


Title - मध्य रेल्वेची त्रेधा!
Posted by : eabhi200k on Jun 10, 2013 - 09:01:21 AM

रविवारच्या सुट्टीच्या दिवशी बरसलेल्या पावसाने मुंबईकर सुखावले असताना मध्य रेल्वे मात्र मान्सूनच्या सुरुवातीलाच ' घसरली '. आधीच मेगाब्लॉक आणि त्यात सकाळपासून पाऊस कोसळल्याने मध्य रेल्वेच्या सेवेची रविवारी त्रेधा उडाली. ट्रॅकवर साचलेले पाणी आणि मेगाब्लॉकच्या दुहेरी फटक्याने लोकलसेवा रखडली. पश्चिम रेल्वेवरील लोकलही २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या.

रविवारी दुपारी पावसाचा जोर वाढला आणि ठाणे स्टेशनजवळ सिग्नलमध्ये बिघाड झाला. यामुळे कळवा व ठाणे स्टेशन दरम्यान लोकलच्या रांगा लागल्या. कळव्याहून ठाणे गाठण्यासाठीच पाऊण तास लागत होता. त्यामुळे ठाणे स्टेशनात प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. स्लो आणि फास्ट अशा दोन्ही सेवा सुमारे दीड तासांहून अधिक उशिराने धावत होत्या. त्यातच ठाणे , मुलुंड , विद्याविहार , कल्याण , कांजूरमार्ग येथे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल रखडतच होत्या. मात्र हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सुरळीत सुरू होती.

मुंब्रा येथे जिना कोसळला

मुंबईसह कल्याण , डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर अशा सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. मुंब्रा येथील सम्राटनगर भागातील नदीम अपार्टमेंट या चारमजली धोकादायक इमारतीचा जिना कोसळला. त्यामुळे ६० रहिवासी घरांमध्येच अडकले होते. फायर ब्रिगेड व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

ठाणे जलमय

पावसाची संततधार कायम राहिल्याने वंदना टाकीज , महाराष्ट्र विद्यालय , कोर्टनाका , गोखले रोड , शिवाईनगर , कोपरी आदी भागात पाणी साचले होते. त्याचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंब्रा स्टेशनबाहेरील हनुमान मंदिर भागातही पाणी साठले. तर कळव्यात बुधाजीनगर भागात घरांवर वृक्ष कोसळला. अंबरनाथ शिवाजी चौकातील पार्किंग प्लाझाच्या कामासाठी उभारण्यात आलेले संरक्षक पत्रे जोरदार वाऱ्यामुळे उडाल्याने गोंधळ निर्माण झाला.