| अंबरनाथ स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा by puneetmafia on 29 May, 2013 - 08:00 AM | ||
|---|---|---|
puneetmafia | अंबरनाथ स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा on 29 May, 2013 - 08:00 AM | |
अंबरनाथ - अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसर, शहरातील पूर्व-पश्चिम विभागाला जोडणारा पादचारी पूल आणि स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रेल्वे स्थानक परिसरात राहणारे नागरिक व प्रवाशांना गैरसोयींचा तोंड द्यावे लागत आहे. शहरातील पूर्व-पश्चिम विभागाला जोडणारा येथे एकमेव लोखंडी पादचारी पूल आहे. सकाळी आणि सायंकाळी ‘पिकअवर्स’ला येथे एकच गर्दी होते. लोखंडी पुलावर दोन्ही बाजूस फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने पादचारी तसेच लोकल गाडय़ांतून उतरून पूर्व-पश्चिम विभागात येणा-या-जाणा-या प्रवाशांचे अत्यंत हाल होत आहेत. त्यातच आता स्कायवॉकवर भाजी विक्रेते आणि भिका-यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना फेरीवाल्यांमधून वाट काढत स्थानक गाठावे लागत लागत आहे. एमएमआरडीएने हा स्कायवॉक बांधून नगरपालिकेकडे देखभालीसाठी दिला आहे. मात्र, नगरपालिकाही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. रेल्वेच्या पादचारी पुलावर गर्दी करून बसणा-या फेरीवाल्यांना कायमस्वरुपी हाकलण्याची आवश्यकता आहे. या फेरीवाल्यांना येथील सुरक्षा दलाचे जवान अधून-मधून हुसकावून लावताना दिसतात. पण, त्यांची पाठ फिरताच फेरीवाले पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसतात. त्यामुळे आरपीएफच्या जवानांनी फेरीवाल्यांना हुसकावण्यापेक्षा त्यांच्या फळभाज्यांच्या टोपल्या जप्त कराव्यात तसेच त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पादचा-यांकडून मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे. | ||